ही महाविकास आघाडी नाहीतर टीव्हीए आघाडी…; शिंदेंच्या शिलेदाराने उद्धव व राज ठाकरेंना डिवचले

Sanjay Nirupam On Uddhav and Raj Thackeray: मराठी भाषेसाठी एकत्र आलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर आता सत्ताधाऱ्यांनी राजकीय बाण सोडण्यास सुरुवात केलीय. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधुंना घेरले जात आहे. या दोघांवर आता थेट राजकीय टीका सुरू झालीय. त्यात शिवसेनेचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी एक ट्वीट करून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीला एक नाव दिले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत संजय निरुपम म्हणतात एमव्हीए ते टीव्हीए… काँग्रेसला वगळून एक नवीन राजकीय आघाडी तयार झाली आहे. पूर्वी ती एमव्हीए म्हणजेच महाविकास आघाडी होती तिचे नवीन नाव टीव्हीए- ठाकरे विकास आघाडी असे असावे.
From MVA To TVA !
कांग्रेस को घटाकर कल एक नया राजनीतिक गठबंधन बना है।
पहले यह MVA था अर्थात महा विकास अघाड़ी।
इसका नया नाम TVA होना चाहिए – ठाकरे विकास अघाड़ी।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) July 6, 2025
सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम; आशिष शेलार
मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव व राज ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. सत्ता होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाढ्या कुरवाळल्या. केंद्रापासून ते महापालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धव यांना सरकार मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दाढी कुरवाळली. आता महापालिकेची सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे दाढी, दाढीवाला आणि दाढी कुरवळणारा याची एक्सपर्टची ही संजय राऊत आणि ठाकरे गटाकडे असल्याची जहरी टीका शेलार यांनी केलीयं. आमच्या दृष्टीने मराठी भाषा विषय अस्मितेचा, अभिमानाचा आणि जिवलग आहे. हा विषय राजकारणाचा नाही, असे आशिष शेलार म्हणाले. (Sanjay Nirupam On Uddhav and Raj Thackeray)
ठाकरेंचा जीव महापालिकेत अडकलेला-सरनाईक
तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य करण्यात आले. राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा ठाकरेंचा जीव महापालिकेत अडकलेला आहे. त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. आता त्यांच्या दुकांनाचे शटर बंद व्हायची वेळ आली म्हणून हे पुन्हा एकत्र येताहेत,अशी टीका सरनाईक यांनी केली.